वेळ सुसाट पळत सुटला आहे. त्याला मुठीत धरण्याचा नाहक प्रयत्न मी सोडून दिला आहे. वेळेबरोबर मी सुध्दा पळत आहे, अगदी जीव मुठीत घेऊन.
कधीकधी नुसतच क्षणभर थांबून बघते की तो किती जोरात पळत आहे आणि आत्तापर्यंत किती जोरात पळत आला आहे. तो दमत कसा नाही? जरा सावकाश का जात नाही? त्याला जरा दमाने घे अस सांगण मी सोडून दिल आहे. जो थांबला तो संपला अस म्हणतात. पण आपण जर थांबलोच नाही तर कळेल कस की आपण दोघे अशी धुमासार स्पर्धा करत आहे एकमेकांशी.
वेळेला मागे टाकून हरवायच स्वप्न तर मी सोडूनच दिल आहे. दिवस उजाडला की पळता पळताच मी ठरवते की आज काय काय गाठायच आहे. मग ह्या धावपळीत कुठल्यातरी मुक्कामास नुसता खो देऊन पुढे पळत सुटायच आणि काही ठिकाणी धावता धावताच जरा घुटमळायच.
दिवसभराच पळण कमी होत बहुदा. म्हणूनच झोपेत माझ मन धावत सुटत. निरनिराळ्या ठिकाणी जाऊन निरनिराळ्या लोकांना भेट देऊन येत. कधी मन थकून शरिराबरोबर जरा विश्रांती घेत तेव्हा मेंदु धाव घेतो. स्वप्नातच आजकाल लेख लिहितो, कविता करतो, दुसरया दिवशीचा बेत व वेग ठरवतो.
वेळ धावत राहतो पण कधीकधी मीच थांबते; दमले नसले तरीसुध्दा. आयुष्यात घडणारया गोष्टींना जडलेल्या भावना मनात झिरपवायला; त्यांच नुसत ’असणं’ जाणवायला !
